गौताळाच्या मुलुखात
भाग १- किल्ले
लहूगड, जंजाळा, घटोत्कच लेणी, आणि वेताळवाडी
औरंगाबाद ! नुसते नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर एक वेगळाच ईतिहास उभा रहातो. जगात प्रसिध्द पावलेली वेरूळ-अजिंठा लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग तसेच यादवांची राजधानी किल्ले देवगिरी.
याच भागातल्या मुख्य अजिंठा डोंगररांगेत त्या काळी राजधानी देवगिरीकडे येणार्या मार्गांवर-घाटवांटावर टेहळणी साठी काही किल्ले बांधले गेले. हा बराचसा भाग 'गौताळा अभयारण्य' या नावाने ओळखला जातो. याच गौताळाच्या मुलुखात असलेल्या किल्ल्यांना भेट देण्याचा योग जुळुन आला तो विकेंडला जोडून आलेल्या गांधी जयंतीच्या सुट्टी मुळे. मुंबई पुण्यापासून हा मुलुख दूर, पण प्रचंड अवशेष समृध्द, खणखणीत तटाबुरूजांचे शेला पागोटे चढवून अजुनही दिमाखात उभे असलेले हे किल्ले अस्सल दुर्ग भटक्यांना आपल्याकडे खेचणार नाही तर नवलच.
मुख्य प्रवाही किल्ल्यांपासून जरा र्दुलक्षित पण आपला खासा ठसा मात्र मनाच्या स्मृती पटलावर कायमचा उमटवतात
किल्ले लहूगड, घटोत्कच लेणी, जंजाळा, वेताळवाडी, सुतोंडा, अंतुर आणि लोंझा.
चर्चेला सुरूवात झाली. या मोहिमेच्या नियोजनात 'ओंकार ओक' ची मोलाची मदत झाली. जाण्याचा मार्ग व तेथील स्थानिकांचा संपर्क अशी बरीच माहिती ओंकार ने दिली. त्याचा आमच्या नियोजनात खुपच फायदा झाला.
या मोहिमेत सहभागी होते, ई.एन.नारायण (अंकल), विवेक नारायण हि बाप लेकाची जोडी, मिलिंद कोचरेकर आणि मी. अंतिमत: असा मार्ग ठरला.
गुरूवारी १ तारखेलाच रात्री निघून.
कल्याण-नाशिक-येवला-वैजापूर-खुल्दाबाद-वेरूळ-फुलांबरी-पालफाटा-नांद्रा-किल्ले लहूगड-पालफाटा-सिल्लोड-उंडणगाव-अंभई-किल्ले जंजाळा- किल्ले वेताळवाडी-हळदा घाट-सोयगाव-पाचोरा-खडकदेवळा-बनोटी मुक्कामी अमृतेश्वर मंदिर हा पहिल्या दिवसाचा टप्पा होता.
रात्री निघण्याबाबत बरेच मतभेद झाले. पण मग ठरवले, या वेळी पल्ला लांबचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढे अंतर पार करू, अगदीच झोप अनावर झाली तर गाडी बाजूला घेऊन आराम करू. खऱेतर या मुळेच आमचा खुप फायदा झाला, रात्री हायवेवरची छोटी मोठी गावं पटकन पार झाली, ना फेरीवाले, ना रिक्षावाले, ना मधे मधे घुसणारे बाईकवाले असे कोणतेही अडथळे नव्हते. रात्री दहा वाजता कल्याणहून निघून आम्ही साडेचार तासातच येवला गाठले. जास्त प्रवास हा गाडीतूनच असल्यामुळे काही चांगल्या मराठी गीतांच्या ‘आनंदघन’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘निवडक जगदिश खेबुडकर’ अशा सीडीज घेतल्या. तसेही विवेक सोबत असल्यामुळे गाडीत विषयाला काही तोटा नव्हता, अमेरीका ते रशिया तसेच अगदी अघोरीनाथा पासून नवनांथापर्यंत सर्व विषय चघळले गेले. असो तर पुढे येवलाहून अर्ध्या तासात वैजापूर. मग वैजापूरहून वेरूळ साठी डावीकडे वळालो आणि खराब रस्त्याची सुरूवात झाली. हेमा मालिनी आणि ओम पुरीचे गाल, तसेच लोण्याचा गोळा ते नागलीचा पापड अशी सर्व तुलनात्मक विशेषणे उध्दार करत लावून झाली.
ओंकारने या रस्त्यांचा महिमा सांगितला होता, त्यामुळे आमची व गाडीची धक्के खाण्याची मानसिकता तयार होतीच.
भल्या पहाटे वेरूळ-खुल्दाबाद पार करत फुलांबरी गावात पोहचायला सकाळचे ६ वाजले, थोडक्यात काय तर वैजापूर ते फुलांबरी हे जवळपास ११० किमी अंतर कापायला चक्क ३ तास लागले. राज्य महामार्ग असुनही रस्त्याची ही अवस्था.
फुलांबरीत चहापाणी करून सिल्लोड रोड वर ४ किमी जाऊन उजवीकडे पालफाटा ते राजूर रस्ता पकडला. पालफाट्याहून अंदाजे ६ किमी वर लहूगडासाठी ( जातेगाव - नांद्रा ) उजवी मारली.
इथेच लहूगडाची पाटी लावलीय. नांद्रा गावाच्या पुढे शेतातल्या रस्त्यामधून गाडी गडाच्या पायथ्याजवळ नेली. लहुगड हा तसा अंजिठा डोंगररांगेत नसून, तो वेरूळ लेण्यांच्या टेकडीच्या रांगेत वसलेला आहे. पण आहे मात्र अवशेषपूर्ण.
आजचा आमचा कार्यक्रम लहूगड, घटोत्कच लेणी, जंजाळा आणि वेताळवाडी पाहून हळदा घाटाने उतरून सोयगाव मार्गे बनोटी गावात अमृतेश्वर मंदिरात मुक्काम असा होता.
सकाळच्या कोवळ्या ऊन्हात छोटेखानी लहूगड चांगलाच उठून दिसत होता. गडावर जाण्यासाठी सुरूवातीला सिमेंटच्या पायर्या बांधल्या आहेत. वाटेत एक शिवलिंग व नंदी आहे, थोडे वर चढून आल्यावर सपाटी लागते.
थोडे पुढे गेल्यावर सांधूचा मठ नजरेस पडतो.
गुहा मंदिराच्या डाव्या बाजूने कातळकोरीव पायर्या ने वर गेल्यावर
कातळकोरीव छोटा दरवाजा लागतो, तिथेच डावीकडे हि लहान गुहा दिसते. तसेच वर चढून गेल्यावर छोट्या टाक्यांचा समूह दिसला.
इथूनच उजव्या बाजूने गडप्रदिक्षणा करता येते, वाटेत अनेक पाण्याची टाकी आणि काही खांब टाकी आहेत, अंदाजे २५ टाकी तरी असतील.
आणखी पुढे गेल्यावर नजरेस पडली ही एक आगळी वेगळी गुहा. सध्या बरीच पडझड झाली असली तरी कातळात खोदलेली टाकी, मध्येच छोटेसे मंदिर हे पाहून थक्क झालो.
दिड तासात गडफेरी करून खाली आलो. वाटेत हा वटवृक्ष दिसला.
आता पुढचा पल्ला होता, किल्ले जंजाळा उर्फ वैशागड.
पुन्हा आल्यामार्गाने जातेगाव पालफाट्याहून उजवीकडे सिल्लोड रोड पकडला तो थेट गोळेगाव पर्यंत, हा औरंगाबाद- अजिंठा मुख्य रोड असुनही भले मोठ्ठाले खड्डे रस्त्यात जागोजागी होते. मुख्य पर्यटन स्थळ अजिंठा आणि रस्त्याची हि अवस्था. गोळेगावहून डावीकडे उंडणगावसाठी वळालो. इथेही खराब रस्ता आमचा सोबती होता. साधारण १२ च्या सुमारास उंडणगावात पोहचलो, इथून दोन रस्ते जातात, डावीकडचा अंभई मार्गे जंजाळा व उजवीकडचा हळदा मार्गे वेताळवाडी. आमच्या प्लान नुसार आम्ही पाऊण तासात अत्यंत खराब अरूंद व मातीकम डांबर या स्वरूपातल्या रस्त्यावरून पाऊण तासात, जंजाळा गावात पोहचलो.
गावात शिरताना हे सामोरे आले, पाहुन फेविकॉल ची जाहिरात आठवली.
घटत्कोच लेणी हि बौध्द लेण्यांमध्ये मोडते. लेणी खुपच प्रशस्त आहे.
मधल्या भागात बुध्दाची मोठी आसनस्थ मुर्ती आहे.
लेणीचा माहितीवजा फलक.
खऱच एवढ्या आडमार्गाला हि प्रचंड लेणी पाहून थक्क झालो.
लेणी सोडल्यापासून अर्ध्या तासानंतर गडाच्या तटबंदीपाशी आलो. तटबंदी अलीकडच्या पठारावरची ही तोफ
घड्याळाचे काटे भराभर पुढे सरकत होते. समोरच असलेला आजच्या दिवसाचा वेताळवाडी किल्ला आम्हाला खुणावत होता. पुन्हा गाडीतून नाणेगाव-अंभई असे करत पुन्हा उंडणगावात आलो. त्यात वाटेत अंभई ते उंडणगाव दरम्यान पावसाची एक मोठी सर हवेत चांगलाच गारवा निर्माण करून गेली. उंडणगावात पुढच्या रस्त्याची खात्री करून घेण्यासाठी विचारले तर जे उत्तर आले ते ऐकून चाटच पडलो. दोन तीन दिवसापूर्वीच्या जोरदार पावसाच्या तडाक्यात हळदा घाटातला अर्धा रस्ता दोन तीन ठिकाणी खचलाय. कालपासून सोयगावहून घाटातून येणारी एस टी पण बंद आहे. आता हे खऱ खोट तपासात न पडता लवकरात लवकर वेताळवाडीच्या दिशेने निघालो. सुर्यराव पश्चिमेकडे निघाले होते. रस्ता तर फारच भयानक काही अंतर गेल्यावरच वरच्या चौकशीची खात्री पटू लागली. ताशी २० किमी च्या वेगाने रखडत रखडत सुमारे अर्ध्या तासानंतर हळदा घाटाच्या सुरूवातीला वेताळवाडी किल्ल्याचे दर्शन झाले.
पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याची तटबंदी उजव्या बाजूने वळसा घालून गेल्यावर हा बुरूज सामोरा आला.
ऐन सायंकाळी वातावरण चांगलेच ढगाळ झाले होते. तसेच बालेकिल्ल्यातून उत्तर दिशेला हि कमानवजा ईमारत.
एवढा अवशेषपूर्ण किल्ला पहाताना वेळ कसा गेला ते कळालेच नाही. खर तर आमच्या तिघांचीही निघायची ईच्छा होत नव्हती. मनात तोच विचार येत होता कि एवढा चांगला किल्ला पण मुक्काम आणि पाण्याची खासा सोय नाही. असो पुढचा पल्ला आणि हळदा घाटाची बातमी आठवून आल्यामार्गे गड उतरून गाडीजवळ आलो. संधीप्रकाशातच हळदा घाट उतरायला सुरूवात केली. रेती मिश्रीत डांबर उखडलेला जागोजागी खड्डे असलेला रस्ता. बॉलबेरींग वरून गाडी जातेय की काय असे काही ठिकाणी वाटले. मध्येच एके ठिकाणी वेताळवाडी गावाच्या दिशेला असलेला वेताळवाडी दरवाजा दिसला. पुढे एका अवघड वळणावर आलो तर खऱच अर्धा रस्ता पूर्ण पणे खचला होता. जेमतेम छोटी कार किंवा जीप एकावेळी जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक होती. पुढे सुध्दा एका वळणावर तीच स्थिती. सावकाशपणे घाट उतरून वेताळवाडी गावात आलो तेव्हा दिवेलागणीची वेळ झाली होती. वेताळवाडी गावातून सरळ जात पंधरा ते वीस मिनिटांत सोयगाव ला चहा नाश्ता साठी थांबलो. सोयगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव. पण गावात सर्वत्र धुळीचे साम्राज्य, त्यात रस्त्याची अवस्था तर फारच भीषण. छोट्याश्या हॉटेलात चहा बिस्कीटे खाऊन, पेट्रोल पंप शोधून गाडीत पुन्हा डिझेल भरून घेतले. कल्याण सोडल्यापासून सायंकाळपर्यंतचा जवळपास ५०० किमी प्रवास झाला होता. तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या प्रवास मार्गात चाळीसगाव पर्यंत पेट्रोल पंप नाही.
आता सोयगावहून आम्हाला नियोजनाप्रमाणे बनोटी या गावी मुक्कामी जायचे होते. सोयगावहून बनोटी ला तिडका मार्गे सरळ रस्ता जातो. अंदाजे अंतर ३५-४० किमी. पण चौकशी केल्यावर कळाले रस्ता प्रचंड खराब आहे. खर सांगायचे तर दिवसभर गाडी हाकून पुन्हा त्या प्रचंड खराब रस्त्यावर गाडी चालवायची माझी मुळीच ईच्छा नव्हती. साहजिकच थोडा लांबचा पण चांगल्या रस्ता निवडला.

बनोटीतल्या शिरसाठ यांचा नंबर होताच. त्यांच्याच खानावळीत रात्रीचे जेवण केले. मुक्कामासाठी गावातल्या अमृतेश्वर मंदिरात गेलो. मंदिर फारच स्वच्छ आणि प्रशस्त. रात्री मंदिराजवळ गाडी लावली तेव्हा ट्रीप मीटर चेक केले तर काल रात्री पासून २४ तासात ५६४ किमी प्रवास झाला होता.




आडवाटेचे उत्तम दुर्ग!
ReplyDeleteप्रवास आणि ट्रेक वर्णन - दोन्ही मस्त..
रेखाटणामुळे कल्पना चांगली येतीये..
धन्यवाद ! खर आहे आडवाटेवरचे हे किल्ले पहाता क्षणीच खिळवुन ठेवतात.
ReplyDelete