Monday, 3 April 2017

Salher






किल्ले साल्हेर
     सकाळी वाजेच्या आतच मोबाईल वाजला बघतो तर अश्विनीचा फोन. "मी आणि चार्वी नाशिक नंदुरबार एस टी बसलो आहोत अंदाजे साडेआठ पर्यंत ताहराबाद पोहचू, तुम्ही दोघे सर्व तयारीनिशी तिथेच भेटा." मग काय मी आणि निखिल सर्व आवराआवरी करून साडेसात आठच्या सुमारास पिंपळनेरहून निघालो. आदल्या दिवशीच्या 'भामेर' आणि 'रायकोट' ची नशा अजूनही उतरली नव्हती.
 पिंपळनेर ताहराबाद रस्ता एकदम मख्खन, दूरदूर पर्यंत शेतमळे, शेतीला पाणी सोडण्याची शेतकरी दादांची लगबग, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्ठाली झाडी हे सर्व काही सकाळच्या गारेगार वातावरणात खुपच आल्हादायक. या पार्श्वभुमीवर फार दूर नाही पण चित्रातले डोंगर रेखाटलेले वैशिष्ट्यपूर्ण असे मांगी-तुंगी महाकाय पाषाणरूपी ध्यानस्थ ऋषीमुनीच जणू.
सेलबारी रांग ओलांडून धुळे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करत अर्ध्या तासातच ताहराबादला पोहचलो. काही वेळातच अश्विनी आणि छोटी चार्वीचे आगमन झाले.
          
आता आमचे लक्ष्य होते, सह्याद्रीतील सर्वोच्च किल्ला तसेच दुसर्या क्रमांकाचे शिखर असा किल्ले साल्हेर. शिवरायांच्या इतिहासात (१६७१) मोलाची कामगिरी बजावलेला, मोरोपंत आणि प्रतापराव गुजर यांचे अतुलनीय शौर्य किंबहुना राजांचा हा मैदानी मुलुखातल्या युध्दातला मोठा विजय अर्थातच त्यामुळे मोगलांवर वेगळीच जरब बसून डांग सीमेलगतचा बरासचा भाग स्वराज्यात दाखल झाला. या सर्व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार 'साल्हेर' तसेच याचे सोबती 'मोरा' 'मुल्हेर' आणि 'हरगड'. डोलबारी रांगेतली हि मातब्बर किल्ल्यांची साखळीच जशी.
     
ताहराबादहून अंतापुर मुल्हेर मागे टाकत छोटासा घाट चढून वर आलो पलिकडे हरणबारी जलाशयाच्या फुगवट्यामागे न्हावी रतनगड मांगी तुंगी सकाळच्या कोवळ्या उन्हात हा नजारा डोळ्यांना खुप सुखावून गेला
पुढे हाच अहवाडांगकडे जाणारा रस्ता सोडून वाघांबे साठी डावीकडे वळालो, समोरच सालोटा आणि साल्हेर खुपच ऊंच भासत होते. गावात घरापाशी अंगणात गाडी उभी केली, मुक्काम गडावर असल्यामुळे सर्व बोजा पाठीवर सोबत भरपुर पाणीसाठा घेऊन आणि पोटभर पाणी पिऊन सुरूवात केली.
सालोटाची एक भलीमोठी सोंड वाघांबे गावाच्या दिशेने उतरली आहे, याच सोडेंवरून खिंडी पर्यंतची चढाई अगदी मळलेल्या पायवाटेने मग कातळकोरीव पायरांचा मार्ग. नीट निरीक्षण केल्यावर असे दिसते की याच मोठ्या सोडेंचे वाघांबे गावालगत दोन उपभाग झाले आहेत. गावातल्या मुख्य मंदिरापासून निघणारी पहिली प्रचलित वाट तर दुसरी मानूरच्या दिशेने थोडे अंतर मुख्य रस्त्याने चालून जात वाटेतल्या ओढ्यावरचा पुल ओलांडल्यावर डावीकडच्या पायवाटेने थोडी चढण पार करून लागलीच पहिल्या झापावर पोहचते.  आम्ही हिच् वाट धरून थोडा वळसा वाचवला, मुख्य सोंड डावीकडे ठेवून तिरक्या रेषेत वर चढाई करत सोंडेवरच्या मुळ वाटेवर आलो. या वाटेने दम लागून चढाई थोडी जाणवली पण लक्षात आले की मुख्य मळलेल्या वाटेच्या तुलनेत आपण बरेच अंतर आणि वळसा वाचवला अर्थातच हे उतरताना आम्हाला प्रकर्षाने जाणवले. मध्येच एका छोट्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली, पाठीमागे सेलबारी रांगेतले मांगी तुंगी न्हावी रतनगड तर डाव्या हाथाला यात डोलबारी रांगेतला हरगड आणि त्याचा सुळका सहज नजरेत येत होता.
छोट्या चार्वीला साल्हेरची चढाई झेपेल ना ? असा प्रश्न अश्विनी आणि खास करून निखिलला पडला. तसे पहाता आतापर्यंत चार्वीने बहुतेक ट्रेकला कुरबुर करता व्यवस्थित साथ दिली मुख्य म्हणजे मकरंदगड, रतनगड, भर पावसात माळशेजची जुणी घाटवाट असे बरेच छोटे मोठे ट्रेक सहज पार पाडले होते आणि तसेही दुपारपर्यंत वर पोहचून लगेच तर परतायचे नव्हते सहाजिकच पुढे दिवसभर आराम मग दुसर्या दिवशी उतराई हे काही फारसे अवघड नाही उलट मी तर म्हणेल की वनडे ट्रेकला नाईट ट्रेक पेक्षा जास्त दमछाक होते कारण चढाई आणि उतराई हि एकाच दिवसात करावी लागते अर्थात त्यामुळे पाठीवरही मोजकेच सामान असते, त्यामुळे चार्वीबाबत मी निश्चिंत होतो. वाघांबे आसपासच्या वाडीतली बरीच मंडळी आपली गुरं घेऊन तसेच लाकुडफाटा सरपण गोळा करण्यासाठी ये-जा करीत असतात. अशातलेच एक सिताराम काका चार्वीला पाहून आमच्या सोबत गप्पा मारत निघाले
सकाळची वेळ आणि त्यात सोबतीला थोडाफार गारवारा हिच काय ती बोडक्या सोडेंवरच्या चढाईला जमेची बाजू.  अरूंद तिरक्या पायवाटेची छोटी ट्रेव्हर्सी पार करून खिंडीत दाखल झालो.
इथे दुसरा मोठा विश्रांती थांबा घेऊन सोबत आणलेली गुळ राजगिरा चिक्की, खजुर, संत्री मग बिस्कीटे असा सुका खाऊ पोटात टाकला.  वाघांबेपासून खिंडीपर्यंत येण्यासाठी आम्हाला अडीच तास लागले, सुरूवातीला बडबड करणारी चार्वी आता मात्र कधी येईल कधी येईल कधी पोहचू असे सारखे विचारत होती.  इथून खऱतर सिताराम काका लाकुडफाटा गोळा करायला जंगलात जाणार होते पण आमचे चेहरे आणि चार्वीकडे पाहून हिला उचलून पहिल्या दरवाज्यापर्यंत येतो म्हणाले.
आता वाट खिंडीच्या पलीकडे आडवी जात मग तिरकी चढण घेत कातळकोरीव पायरांने वर चढत पहिल्या दरवाजात पोहचली. सिताराम काका आणि निखिल झटपट पुढे गेले, मग मी आणि अश्विनी वीस मिनिंटात पहिल्या दरवाजात पोहचलो.
इथेच सिताराम काकांचा निरोप घेतला.
आता पुढे होती ती सरळसोट कातळातल्या पायरांची चढाई, मागे सालोटा तर जणू काळ्याकुट्ट बसाल्टचा दगडी पिरामिडच.
एक एक पायरी चढत वाटेतला दुसरा आणि तिसरा दरवाजा पार करून बर्यापैकी ऊंची गाठली.

साधारण अर्धा पाऊण किमी कातळातली आडवी वाट कड्याच्या बाजूला काही खोदलेल्या गुहा बहुतेक कोरडया तर एका बाजूला खोल दरी
शांतपणे तो टप्पा पार करून चौथ्या दरवाजाने साल्हेरच्या गादीपठारावर आलो.  

मळलेल्या पायवाटेने आरामात दहा पंधरा मिनिटात दोन टाक्यांसमोरच्या रेणुका माता मंदिराजवळ पोहचलो. मंदिरामागचा तलाव पाहून आश्चर्यचकीतच झालो   मागे २००६ च्या फेब्रुवारीत इथे आलो होतो आता तर ऐन जानेवारीतच तलावातली पाण्याची पातळी तेव्हा पेक्षाही जास्त खालावलेली दिसली.
आत्ता हि हालत तर पुढे उन्हाळ्यात  काय ! हाच विचार मनात आला.  पुण्यामुंबईकडचे दोन ग्रुप भेटले ते गड उतरण्याच्या तयारीत होते, त्यातला एक ग्रुप सालोटा करून भिलवाडला मुक्कामी जाणार होता. मंदिराजवळून थोड्या वरच्या अंगाला चढाई करत मुख्य गुहेत डेरा टाकला.
आता आमचा मुक्काम याच गुहेत, गुहा तीन भागात विभागली गेली आहे पहिल्या भागात कोरीव खांब आहेत.
मधली दर्शनी गुहा तर तिसर्या भागात मारूतीराया विराजमान आहेत.
स्थिरस्थावर झाल्यावर यज्ञकुंडाजवळच्या पाण्याच्या टाक्यातून पाणी भरून आणले, दुसरे महत्वाचे काम म्हणजे स्वयंपाकचूलीसाठी लाकुडफाटा शोधणे. संपुर्ण गडावरच्या पठारावर मोठी लाकड मिळतील अशी झाडीच नाही. मग खुरट्या झुडुपांच्या काट्याकुट्या, वाळलेले गवत ते अगदी नारळाच्या करवंट्यापर्यंत सर्व जमा करून ठेवले.
भर दुपार नंतर आता गडावर होतो फक्त आम्हीच. मला तरी असा किल्ल्यावरचा मुक्काम फार भावतो. त्यातल्या त्यात फक्त तुम्हीच असाल आणि गर्दी गोगांट करणारे कुणी नसेल तर तुमच्या ट्रेकर दोस्तांसमवेत असल्या किल्ल्यांवर मुक्कामाची गोष्टच न्यारी. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या किल्ल्यांच्या तटाबुरूजांवरून अथवा एखाद्या ऊंच टेपाडावरून किंवा कड्यावरून दिसणारे सुर्योदय आणि सुर्यास्त तसेच सुर्यास्तानंतर संधीप्रकाशात अनुभवायला मिळणारी गुढ शांतता, हळुवारपणे काळोखात नेणारी रात्र सोबत अगणित तारकांचा खेळ, तितकीच प्रसन्न सकाळ. एकदा हे सर्व अनुभवले तर तो ट्रेक कायमचा फेव्हरेट होणार आणि पुन्हा शरीराने मनाने ताजेतवाने होऊन परतणार यात शंकाच नाही.
                 सायंकाळी मी आणि अश्विनी गडाच्या सर्वोच्च माथ्यावरील परशुराम मंदिराकडे निघालो. सह्याद्रीतल्या ऊंच किल्ल्याचे हे स्थान तसेच कळसुबाईनंतरचा दोन नंबरचा मान या परशुराम शिखराचा. पण एक गोष्ट मात्र खऱी कळसुबाई आणि इथे उभं राहिल्यावर आजूबाजूचा नजारा थक्क करणारा, थोडक्यात आपल्यापेक्षा सभोवतालचे सर्वच खाली आणि आपण अधिक ऊंचीवर.
पुर्वेकडे सालोट्यावर नीट निरखून पाहिल्यावर दुपारचा ग्रुप उतरताना दिसत होता. तसेच चारही दिशेला नजर फिरवली तेव्हा टकारा, सेलबारी-डोलबारी रांगेतले किल्ले, डांग गुजरातकडचा मुलुख तसेच कुठंतरी वाचलेले परशुरामाने कोकणची निर्मिती करताना जो बाण सोडला तो इथूनच आणि तो ज्या समोरच्या डोंगराला छेदून आरपार गेला ते नेढे आणि तो डोंगर म्हणजेच पिंपळा उर्फ कंडाळा किल्ला दुरवर चौलेर किल्ला सहज ओळखू आला.
जसे हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, वासोट्याचा बाबूकडा तसा साल्हेरचा शैलकडा. पुरातनकाळापासून डांग आणि घाटावरील बागलाण भागातल्या व्यापार आणि दळणवळणासाठी सहा महत्वांच्या वाटेवर लक्ष ठेवण्यात उपयुक्त म्हणूनच सहाहेर ते साल्हेर असे नाव पडल्याचे ऐकीवात आहे.
चार्वी आणि निखिल गुहेतच होते जास्त उशीर नको म्हणून परत येताना मुख्य वाटेने गुहेत आलो तर चढताना मात्र खालच्या बाजूने सरळ मंदिराच्या विरूध्द बाजूने चढाई करत गेलो होतो ही वाट फारच घसारा आणि तीव्र चढणीची.
उतरताना गंगासागर तलाव तर खासच दिसत होता. अजून थोडे खाली आल्यावर गुहेसमोरच्या अंगणातून चार्वी आम्हाला आवाज देत होती.
आल्यावर पहिले चूल पेटवून चहा केला. मावळतीचे रंग पहात चहाचे घोट घेत एक वेगळीच हवीहवीशी शांतता अनुभवली हेच तर ट्रेक ला हवे. त्या नीरव शांततेत स्वत:शी संवाद साधत हरवून जात, जमलेच तर थोडाफार ईतिहास स्मरण करावा असो....
थोड्यावेळाने अंधारून आल्यावर दुरवंर दरीत छोट्या खेड्यापाड्यातले दिवे लुकलुकत होते. चंद्र पलीकडच्या बाजूला असल्यामुळे गुहेसमोर काळोखात चांदण्यांची रांगोळी पहात बसलो. गरमागरम सुप पिऊन, स्वयंपाकाची तयारीचा अश्विनी सोबत असल्यामुळे प्रश्नच नव्हता.
खिचडी पापड लोणचे असा साधा झटपट मेनू. जेवणाच्या वेळी चार्वी झोपी गेली. दिवसभराची चाल आणि चढाईने अपेक्षितच होते. सर्व आवराआवरी करून आम्हालाही पाठ टेकताच झोप लागली. मध्ये रात्री एकदोन वेळा जाग आली ती मात्र उंदरांच्या करामतीमुळे.
                 
सकाळी उजाडण्याआधीच उठलो, सुर्योदय पहाण्यासाठी निखिलसोबत पुन्हा परशुराम मंदिराकडे निघालो. सकाळच्या थंडगार वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवत होता.
सालोटाच्या उजवीकडून सुर्योदय झाला, हळूहळू सर्व आजूबाजूंच्या शिखरांवर तो सोनेरी पिवळा धम्मक प्रकाश पसरला.
खाली खेड्यापाड्यात ही लगबग जाणवत होती तिथूनच कुठल्यातरी मंदिरातून सकाळी सकाळी भक्तिगीत कानावर पडले वार्यानुसार तो आवाज कमीजास्त होत होता.
ज्याने इथून सुर्योदय सुर्यास्त पाहिले तो हे क्षण कदापि विसरणे शक्य नाही. मंदिर पुर्वाभिमुख असल्यामुळे तेही या सोनेरी प्रकाशात चांगलेच उजळून निघाले.
मनसोक्त फोटोग्राफी करून पुन्हा खाली गुहेत परतलो. आल्यावर अश्विनीने चहा तयार ठेवलाच होताच, वाह क्या बात है.
सकाळची सर्व आवराआवर नाश्ता करून मुक्कामाची गुहा स्वच्छ करून सामान पाठपिशवीत भरले.



खऱतंर अश्विनीला मला साल्हेरवाडीच्या वाटेवरची दरवाजांची मालिका दाखवायची होती पण परतीचा  दूरचा  पल्ला लवकरात लवकर गाठायचा असल्यामुळे ते शक्य नव्हते तसेच आल्यामार्गे परतीच्या वाटेवर निघालो.
पुन्हा एकदा रेणुकामातेचे दर्शन घेतले, तसे तर इथून निघावे असे वाटतच नव्हते पण नाईलाज काय करणार. 

पुन्हा कातळकोरीव पायरा आडवी वाट एक एक दरवाजा पार करून खिंडीत आलो. खिंडीत नेहमी प्रमाणे आसपासच्या गावकरींची गुरं तसेच लाकुडफाटा शोधण्याची गडबड, विश्रांती घेत असताना माळदर गावातले भावदास पवार  आमच्याकडे पाहून म्हणाले, साल्हेरला जाऊन आलात चला येळ आहे तर सालोटापण पाहून घ्या. खरंतर २००६ मध्ये मी आणि नारायण अंकलने या सेलबारी-डोलबारी आणि सातमाळा रांगेतल्या निवडक किल्ल्यांचा आठवडाभराचा जंबो ट्रेक केला होता, दुर्दैवाने त्यावेळीही वेळेअभावी सालोटा हुकला होता आणि आता या वेळी भर उन्हात छोट्या चार्वी सोबत शक्य नव्हते तसेही लवकरात लवकर घरी पोहचायचे. पावसाळ्यानंतर खास सालोटासाठी पुन्हा येऊ असे पवार मामांना सांगितले.
खिंडीतून वाघांबे पर्यंतची चाल आता भर उन्हातच पार करावी लागणार होती. पण सोबतचा भरपुर पाणीसाठा जोडीला संत्री, काकडी, खजुर वाटेत एकदोन ठिकाणी छोट्या झुडुपांच्या सावलीत विश्रांती घेत बरोब्बर दुपारी दिडच्या सुमारास गावात दाखल झालो.

रविवार होता गावात जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात पोलिओचा बुथ लागला होता, चार्वीला पोलिओ डोस देऊन गाडी उभी केलेल्या घरापाशी आलो. हाथपाय धुवून फ्रेश झालो भरपुर थंडगार पाणी पिऊन सोबतच्या पाण्याच्या बाटल्या भरून त्यांचा निरोप घेतला. परताना तारहाबाद मार्गे येता साल्हेरला प्रदक्षिणा घालत मानुर रस्ता पकडला
पुढे कनाशी अभोणा वाटेत अर्जुन सागर प्रकल्प पाहत नांदुरी मार्गे सायंकाळी नाशकात दाखल झालो. तिथेच आप्तांकडे आग्रहपुर्वक मटणाचे जेवण करून रविवार सार्थकी लागून ट्रेक खर्या अर्थाने परिपूर्ण झाला.

योगेश चंद्रकांत आहिरे
























































































































1 comment: